Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


वैयक्तिक अपघात विमा : आजच्या काळाची अत्यावश्यक गरज

भारतामध्ये रस्ते अपघातांची संख्या चिंताजनक पातळीवर आहे. दरवर्षी अंदाजे १२ लाख लोक रस्ते अपघातात मरण पावतात आणि ५ कोटी लोक जखमी होतात. आपला देश रस्ते अपघातांची सर्वाधिक आकडेवारी असलेला देश आहे. एका ताज्या अहवालानुसार, देशात दररोज सुमारे १,२६४ रस्ते अपघात होतात आणि त्यातून सुमारे ४६२ मृत्यू होतात. याचा अर्थ प्रत्येक तासाला ५३ अपघात आणि १९ मृत्यू होतात. हे आकडे केवळ भीतीदायक तर आहेतच शिवाय प्रत्येक व्यक्तीने आपल्या सुरक्षितता आणि त्याद्वारे येणाऱ्या संभाव्य आर्थिक बोज्याकडे गंभीरपणे पाहावे असे सूचित करणारे आहेत.

वैयक्तिक अपघात विमा गरजेचा का आहे? सडक दुर्घटना किंवा अपघात अचानक होतात आणि त्याचे परिणाम केवळ शारीरिक किंवा मानसिकच नसतात, तर आर्थिक दृष्ट्याही मोठे ओझे निर्माण करतात. अशा परिस्थितीत वैयक्तिक अपघात विमा (Personal Accident Insurance) ही मोठी सुरक्षा ठरते. वैयक्तिक अपघात विम्यामुळे अपघाती मृत्यू, अपंगत्व (कायम किंवा तात्पुरते) आल्यास वैद्यकीय खर्च आणि इतर संबंधित खर्चांसाठी आर्थिक मदत मिळते. यामुळे व्यक्ती आणि कुटुंबाला अपघाताच्या आर्थिक परिणामांपासून सुरक्षित ठेवण्यास मदत होते.

फायदे वैयक्तिक अपघात विम्याचे:
अपघाती मृत्यूसाठी भरपाई: अपघातामुळे विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, त्याच्या कुटुंबाला विमा म्हणून ठरलेली रक्कम मिळते, जी त्यांना आर्थिक अडचणीतून सावरण्यास मदत करते.
अपंगत्वासाठी संरक्षण: अपघातामुळे विमाधारकास कायमस्वरूपी किंवा तात्पुरते अपंगत्व आल्यास पॉलिसीच्या अटींनुसार आर्थिक भरपाई मिळते.
वैद्यकीय खर्चाचे संरक्षण: अपघाता मुळे हॉस्पिटलायझेशन झाल्यास लागणाऱ्या वैद्यकीय उपचारांचा खर्च तसेच होणारी पगार तुट विमा पॉलिसीद्वारे कव्हर केली जाते ज्यामुळे मोठा आर्थिक भार वाचतो.
आर्थिक सुरक्षा: अपघात ही अनपेक्षित घटना असून, त्यामुळे अचानक येणाऱ्या आर्थिक संकटांना सामोरे जाण्यासाठी विमा एक मोठा आधार असतो.
कौटुंबिक आधार: विमाधारकाच्या अनुपस्थितीत कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्यास हा विमा खूप उपयुक्त ठरतो.

हे ही लक्षात घ्या ! वैयक्तिक पॉलिसीमध्ये केवळ एक व्यक्तीचा समावेश असतो, पण फॅमिली प्लॅन्समध्ये पती/पत्नी व अवलंबित मुले यांचा समावेश करता येतो. काही मोठ्या कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना ग्रुप पॉलिसीद्वारे कव्हर देतात, परंतु प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी, योग्य विमा सुरक्षा असणारी स्वतंत्र पॉलिसी घेणे सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.

वास्तव परिस्थिती: सध्या भारतातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत वैयक्तिक अपघात विमा घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. बरेच लोक नोकरीतील गट विम्यावर अवलंबून राहतात. पण नोकरी बदलली किंवा निवृत्तीनंतर असे कव्हर आपोआप संपते. म्हणूनच, स्वतंत्र पॉलिसी घेणे शहाणपणाचे ठरते.

आपण सडक सुरक्षितता वाढविण्यासाठी काय उपाययोजना करू शकतो ?

  • रस्ते सुरक्षा (Road Safety) / Traffic Education याबाबत असलेले नियम आणि कायदे जमवुन घेऊन त्यांचे पालन करणे, जागरूकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणे
  • वाहन चालविताना प्रगत ड्रायव्हर सुरक्षा प्रणाली (Advanced Driver Safety Systems) जसे फॉरवर्ड कोलिजन वॉर्निंग (Forward Collision Warning) आणि लेन डिपार्चर वॉर्निंग (Lane Departure Warning) यांसारख्या तंत्रज्ञानाचा वापर करणे

निष्कर्ष: अपघात कधी, कुठे, कोणावर होईल हे कुणालाच सांगता येत नाही. पण योग्य वैयक्तिक अपघात विमा घेऊन आपण आपल्या कुटुंबाचे आर्थिक रक्षण नक्कीच करू शकतो. जीवन अनमोल आहे, आणि त्याला आर्थिक कवच देणे ही आपली जबाबदारी आहे. 👉 म्हणूनच आज विचार करा – “आपल्याकडे वैयक्तिक अपघात विमा आहे का?” नसल्यास जरूर तुमच्या आर्थिक सल्लागाराशी संपर्क साधा !!

टीम SWS


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/