Money चे अंतरंग

Financial Literacy Initiative by SWS


मनो-Money: भाग १८ :आहे भविष्यकाळ अटळ म्हणून…- डॉ. रुपाली कुलकर्णी

 

आहे भविष्यकाळ अटळ म्हणून…

 

आज राधा खूप उदास मूडमध्ये दिसते आहे. आई – बाबा तिला बोलते करण्याचा प्रयत्न करतात.

आई: आज इतका कसा चेहरा उतरलाय राधा ? काय झाले?

राधा:आई, तुला माझ्या वर्गातील योगिता माहिती आहे ना ? तिचा सांभाळ लहानपणापासून तिच्या आजीनेच केला आहे, ती योगिता?

आई: हो ग. तिची आजी चार घरी कामे करुन योगिताला शिकवित आहे. तीच ना? तिचे काय ?

राधा: अग तिच्या आजीला अपघात झाला आणि आता ती ४ महिने तरी कामे करू शकणार नाही. योगिताला तर दुसरे कोणीही नाही. आता त्यांचा घरखर्च, शाळेचा खर्च कसा चालणार म्हणून योगिता खूप काळजीत होती आज.

बाबा: अच्छा, असे आहे तर. आपण त्यांना भेटायला जाऊ. शाळेतही जाऊ. तिथे बोलून काहीतरी मार्ग नक्की काढू. तू चिंता करू नकोस.

राधा:हो बाबा, शाळेत ताई तिला, आजीला पेन्शन मिळते का असे विचारित होत्या. बाबा, काय असते हे पेन्शन?

बाबा:अग पेन्शन म्हणजेच निवृत्तीवेतन. कुठल्याही व्यक्तीचा नोकरीतील कार्यकाळ संपला की तिचे वेतन थांबते. मग तिचा वृद्धापकाळाचा खर्च कसा चालणार सांग बरे ? यासाठी, कर्मचाऱ्याच्या कार्यकाळात त्याची कंपनी किवा संस्था, दरमहा त्याच्या वेतनातील काही भाग बाजूला काढते आणि त्यात स्वतःतर्फेही काही योगदान जमा करते. म्हणजे मग निवृत्तीनंतरही त्या व्यक्तीस, या  जमा राशीतून ठराविक रक्कम, निवृत्ती नंतरचे वेतन अर्थात पेन्शन म्हणून दरमहा मिळू शकते. या अशा सोयीमुळे वृद्धापकाळातही त्या व्यक्तीचा घरखर्च चालू शकतो.

राधा:पण बाबा, योगीताच्या आजीला असेल का असे पेन्शन?

बाबा: अग मी सांगितलेली सुविधा ही बहुतांश करुन सरकारी कर्मचारी किंवा इतर संघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी आहे. पण असंघटीत क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीना किंवा असे लोक ज्यांचे पोट हातावर असते त्यांना मात्र पेन्शन मिळत नाही.

आई:अग पण भारत सरकारला गरीब लोकांच्या वृद्धापकाळातील उत्पन्नाच्या बाबतीत चिंता वाटते. तसेच असंघटीत कार्यक्षेत्रातील कामगारांच्या, दीर्घायुषी आयुष्यात येणाऱ्या अनेक समस्यांवर उपाय म्हणून भारत सरकार त्यांना निवृतीनंतरच्या आयुष्यासाठी बचत करण्यासाठी उद्युक्त करते आहे. त्यासाठी सरकारने अटल पेन्शन योजना सुरु केली आहे.

बाबा:हो राधा. हि योजना सर्व बँक खातेदारांसाठी खुली आहे. १८ ते ४० या वयोगटातील ज्या व्यक्ती आपले योगदान बॅंकेत ठेवतात त्यांना त्यांच्या योगदानाच्या प्रमाणात, कायमस्वरूपी, दरमहा रु १००० ते रु ५००० असे पेन्शन मिळू शकते. जितक्या लवकर वर्गणीदार योजनेत सामील होईल तेव्हढे त्याचे  योगदान कमी असते आणि वयानुसार ते वाढत जाते. योगदान जमा करण्याचा कालावधी कमीत कमी २० वर्षाचा हवा असतो आणि वयाच्या  ६० व्या वर्षी पेन्शन मिळणे लागू होते.

राधा: आई, बाबा, गरिब जनतेसाठी ही तर खूपच चांगली सुविधा आहे. योगीताच्या आजीला मात्र आता याचा उपयोग होणार नाही असे दिसते.

आई: हो राधा. त्यांच्यासाठी आपण सगळ्यांशी बोलून नक्कीच काहीतरी मार्ग काढू. पण आजच्या ह्या बोलण्यातून तुला काय समजले ते तरी सांग.

राधा: येस आई ! मला समजलेले हेच की वृद्धापकाळ हा अटळ आहे. तेव्हा तो सुखाने व्यतित करता येण्यासाठी प्रत्येकाने लवकरात लकवर त्यासाठी बचत किंवा गुंतवणूक केली पाहिजे. राईट बाबा?

बाबा: येस ! करेक्ट ! चला आता, आपण योगीताच्या घरी जाऊन येऊ !   

   डॉ. रुपाली कुलकर्णी,

     ट्रेनिंग हेड


Discover more from Money चे अंतरंग

Subscribe to get the latest posts sent to your email.



Subscribe Here

About Us

Welcome to SWS Financial Solutions Pvt Ltd, a leading financial advisory firm established in 1995, with a commitment to providing our clients with sound financial advice and personalized financial solutions. Our team of Certified Financial Planners (CFPs), Registered Investment Advisors (RIAs), Chartered Financial Analysts (CFAs), and Chartered Accountants (CAs) are dedicated to providing comprehensive financial planning and wealth management services to individuals, families, and businesses. Read more @ https://www.swsfspl.com/