–
मीरा ताई बासष्ठ वर्षांच्या झाल्या, तेव्हा त्यांच्या आयुष्यात कोणताही मोठा सोहळा झाला नाही. ऑफिसमधून निवृत्ती घेतल्यासारखा सत्कार, भाषण किंवा फुलांचा वर्षावही नव्हता. कारण त्यांनी आयुष्यभर कुठल्याही कार्यालयात नोकरी केली नव्हती. संसार, मुले, नातेवाईक, सणवार, बचत, काटकसर—या सगळ्यांची जबाबदारी त्यांनी अत्यंत चोखपणे पार पाडली होती. मुलं सेटल झाली होती, घरात शांतता होती आणि पतीची पेन्शन सुरू झाली होती. पण मनाच्या एका कोपऱ्यात प्रश्न सतत डोकावत होता—“आता उशिरा का होईना, पण माझ्यासाठी आर्थिक नियोजन करता येईल का?”
हा प्रश्न केवळ मीरा ताईंचाच नाही. भारतात असंख्य ज्येष्ठ महिला आहेत, ज्यांनी आयुष्यभर कुटुंबासाठी काम केलं, पण स्वतःसाठी कधी आर्थिक निर्णय घेतला नाही. त्यांना असं वाटतं की आर्थिक नियोजन, गुंतवणूक किंवा संपत्ती निर्माण हे फक्त पगारदार, नोकरी करणाऱ्या लोकांसाठी असतं. प्रत्यक्षात, निवृत्तीनंतर संपत्ती निर्माण म्हणजे नव्याने कमाई सुरू करणं नव्हे; तर जे आहे ते समजून घेणं, जपून वाढवणं आणि स्वतःच्या गरजांसाठी निर्भयपणे वापरणं होय.

आजची भारतीय अर्थव्यवस्था वेगाने बदलत आहे. बँक खाती, सरकारी योजना, डिजिटल व्यवहार यांचा विस्तार मोठ्या प्रमाणावर झाला आहे. अनेक ज्येष्ठ महिलांच्या नावावर आता बँक खाती आहेत, त्यांना व्याजाचे मेसेज येतात, पेन्शन जमा होते; पण या सगळ्याचा अर्थ काय, याची स्पष्टता नसते. पैसा हातात असतो, पण आत्मविश्वास नसतो. हीच खरी अडचण आहे.
याच काळात महागाई सतत वाढते आहे. पूर्वी फक्त वर्तमानपत्रात वाचायला मिळणारी ‘महागाई’ आता रोजच्या भाजीच्या दरात, औषधांच्या खर्चात, तपासण्यांच्या बिलात जाणवते. आरोग्यावरील खर्च तर सामान्य महागाईपेक्षा कितीतरी वेगाने वाढतो. शिवाय, कुटुंबव्यवस्था बदलली आहे. मुले परदेशात किंवा दुसऱ्या शहरात असतात. अनेक ज्येष्ठ महिला एकट्या राहतात किंवा बराच काळ स्वतःचं व्यवस्थापन करतात. अशा वेळी आर्थिक नियोजन म्हणजे केवळ आकडेमोड नसून, आयुष्याच्या वास्तवाशी जोडलेला विषय ठरतो.
नोकरी/व्यवसाय न केलेल्या ज्येष्ठ महिलांसाठी आर्थिक नियोजनाची सुरुवात बहुतेक वेळा मानसिक पातळीवर होते. मीरा ताईंनी एक दिवस वही घेऊन बसून घरातील सगळी आर्थिक माहिती लिहायला सुरुवात केली—फिक्स्ड डिपॉझिट, बचत खाती, थोडंसं सोनं, घर, पेन्शन. जे सगळं विखुरलेलं वाटत होतं, ते एकत्र दिसू लागलं. भीती कमी झाली. आत्मविश्वास वाढला. त्यांना जाणवलं की त्या शून्यातून सुरुवात करत नाहीयेत; फक्त आतापर्यंत स्वतःच्या संपत्तीकडे ‘संपत्ती’ म्हणून पाहिलं नव्हतं.
शांता मावशींची कहाणी थोडी वेगळी होती. त्या विधवा होत्या आणि एकट्या राहत होत्या. मुलं परदेशात. उत्पन्नाचा स्रोत म्हणजे पतीची पेन्शन आणि थोडी बचत. आधी त्यांनी सगळा पैसा दीर्घकालीन ठेवींमध्ये गुंतवून ठेवला होता. “कधी काही गरज पडली तर?” ही भीती सतत होती. पण वय वाढत गेल्यावर त्यांना लक्षात आलं की सुरक्षिततेबरोबरच सहज उपलब्धता तितकीच महत्त्वाची आहे. त्यांनी काही रक्कम सहज काढता येईल अशा पर्यायांमध्ये ठेवली आणि उरलेली सुरक्षित ठिकाणी. त्यामुळे अचानक वैद्यकीय खर्च आला, तरी गोंधळ उडाला नाही.
अशा अनेक ज्येष्ठ महिलांसाठी सरकारी योजना हा निवृत्तीनंतरच्या आर्थिक नियोजनाचा मजबूत आधार ठरतो. मीरा ताईंनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत काही रक्कम गुंतवली. त्यांना आकर्षण वाटलं ते फक्त व्याजदराचं नव्हे, तर नियमित उत्पन्नाचं. दर तीन महिन्यांनी येणारं व्याज घरखर्चासाठी उपयोगी ठरलं आणि सरकारी हमीमुळे मनःशांती मिळाली.
सविता काकूंना साधेपणा आवडायचा. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या फिक्स्ड डिपॉझिट्स निवडल्या. दर महिन्याला व्याज खात्यात येत असे. खर्च भागत असे आणि मूळ रक्कम सुरक्षित राहात असे. परतावा फार मोठा नव्हता, पण स्थैर्य होतं—जे त्यांच्या स्वभावाला साजेसं होतं.
मात्र केवळ पारंपरिक बचतीवर अवलंबून राहिलं, तर महागाई हळूहळू पैशाची किंमत कमी करते. हे अनेकांना उशिरा लक्षात येतं. म्हणूनच काही ज्येष्ठ महिलांनी मर्यादित प्रमाणात वाढीच्या पर्यायांकडे वळणं स्वीकारलं. लता आंटी, निवृत्त शिक्षिका, यांनी सगळी बचत सुरक्षित ठिकाणी न ठेवता थोडा भाग संयमित म्युच्युअल फंडांमध्ये ठेवला. त्या रोज बाजार पाहत नव्हत्या, चढउतारांबद्दल घाबरत नव्हत्या. दीर्घकालीन दृष्टीने त्यांनी विचार केला. त्यामुळे त्यांच्या पैशाचा काही भाग वाढत राहिला आणि गरजेपुरतं उत्पन्नही मिळत राहिलं.
वय हा महत्त्वाचा घटक आहे. साठच्या आसपास असलेली महिला अजून शिकू शकते, थोडा धोका स्वीकारू शकते. सत्तरच्या पुढे प्राधान्यक्रम बदलतो. सहज उपलब्धता, आरोग्यखर्चाची तयारी, मानसिक शांतता हे महत्त्वाचं ठरतं. हे भीतीपोटी नाही, तर अनुभवातून आलेलं शहाणपण असतं.
राहण्याची परिस्थितीही आर्थिक निर्णयांवर परिणाम करते. एकटी राहणाऱ्या महिलेला तात्काळ वापरता येईल असा निधी आवश्यक असतो. सगळा पैसा लॉक करून ठेवणं धोकादायक ठरू शकतं. कुटुंबासोबत राहणाऱ्या महिलांसाठीही स्वतःच्या आर्थिक स्थितीची जाणीव असणं महत्त्वाचं असतं. यामुळे अवलंबित्व कमी होतं आणि आत्मसन्मान वाढतो.
आरोग्य नियोजन हा निवृत्तीनंतरच्या संपत्तीचा अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे. कमला बाईंच्या बाबतीत अचानक आजारपणामुळे मोठा खर्च झाला आणि वर्षानुवर्षांची बचत कमी झाली. त्या आजारातून सावरल्यानंतर त्यांनी आरोग्य विमा आणि वैद्यकीय निधी याकडे गांभीर्याने पाहिलं. त्यानंतर त्यांचा पैशाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. भीती नाहीशी झाली, आत्मविश्वास वाढला.
भारतीय महिलांची एक सवय म्हणजे स्वतःसाठी पैसा खर्च करताना अपराधीपणाची भावना. सविता काकूंनी जेव्हा संगीत शिकण्याचा वर्ग लावला, तेव्हा तो खर्च फारसा नव्हता; पण त्यातून मिळालेला आनंद अमूल्य होता. निवृत्तीनंतर संपत्तीचा उपयोग केवळ साठवण्यासाठी नाही, तर आयुष्य जगण्यासाठी असतो, हे त्यांना उमगलं.
आज तंत्रज्ञानाचाही मोठा वाटा आहे. सुरुवातीला डिजिटल बँकिंगची भीती वाटते, पण थोडी माहिती, थोडा आत्मविश्वास मिळाल्यावर अनेक ज्येष्ठ महिला स्वतः खात्याची माहिती तपासू लागतात. यामुळे फसवणूक टळते आणि स्वावलंबन वाढतं. नोकरी/व्यवसाय न केलेल्या ज्येष्ठ महिलाही आजही समाजासाठी मोलाची भूमिका बजावत असतात. त्यांचा अनुभव, मार्गदर्शन, भावनिक आधार हीच खरी संपत्ती आहे. आर्थिक सुरक्षिततेसोबत हे सामाजिक योगदान मिळून जीवन समृद्ध होतं.
निवृत्तीनंतरची संपत्ती म्हणजे केवळ आकड्यांची बेरीज नाही. ती आयुष्याशी जुळवून घेतलेली योजना आहे—वय, आरोग्य, राहणीमान आणि स्वतःच्या आनंदाचा विचार करणारी. आयुष्यभर घर सांभाळणाऱ्या भारतीय महिलांनीही या टप्प्यावर स्वतःसाठी विचार करणं हे स्वार्थ नव्हे, तर स्वाभिमान आहे. निवृत्ती म्हणजे पूर्णविराम नाही. ती एक नवी सुरुवात आहे—जिथे पैसा भीतीचा विषय न राहता, सुरक्षित आणि सन्मान्य आयुष्य जगण्याचं साधन ठरतो.

डाॅ.सौ. मृणालिनी दोडके
